Tuesday, April 8, 2025

प्रयत्नानेच कार्य सिद्ध होतात, केवळ इच्छांवर नाही !...माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 महिलाशक्तीचा जागर — चाकूरमध्ये महिला शेतकरी उद्योजकता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


"उद्यमेन हि सिध्यन्ति, कार्याणि न मनौरथे" म्हणजेच " प्रयत्नानेच कार्य सिद्ध होतात, केवळ इच्छांवर नाही." या प्रेरणादायी वचनाचे स्मरण करून देत, कोणत्याही गोष्टीचे यश मिळवण्यासाठी फक्त इच्छा किंवा आकांक्षा पुरेशी नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, प्रयत्न आणि समर्पण आवश्यक असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेद्वारे चाकूर (जिल्हा लातूर) येथे महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक ८ एप्रिल रोजी आयोजित ‘महिला शेतकरी उद्योजकता मेळाव्याच्या’ अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

हा मेळावा विद्यापीठ, उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती चाकूर अंतर्गत आदर्शनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित, वडवळ (ना.) व नवअस्मिता शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित, चापोली  यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

कार्यक्रमात पुढे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महिला शक्तीच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना सांगितले की, महिलाशक्ती हा देशाचा आधारस्तंभ आहे. आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुढे आहेत. त्यांचे योगदान विकसित भारत घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांनी महिलांना उद्योजकतेच्या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष अतिथी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही महिलांनी गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारावेत आणि आपल्या कुटुंबाचा सबलीकरणासाठी कार्य करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमात यशस्वी उद्योजिका व माजी सदस्या राज्य महिला आयोग सौ. आशाताई भिसे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना 'मन आणि मनगट मजबूत ठेवा, चिकाटीने उभे रहा' असा सशक्त संदेश दिला.

कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. गजेंद्र लोंढे,  विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी तसेच उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री. महादेव शेळके यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थाचे सहयोगी  अधिष्ठाता ,डॉ. संतोष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती झिरमिरे यांनी तर आभार प्रदर्शन आदर्शनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादितचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील राठोड यांनी केले.

या यशस्वी कार्यक्रमात संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. ज्योती झिरमिरे, श्री. अभिषेक राठोड, श्री. आशिष महेंद्रकर, श्री. पितांबर पिरंगे, श्री. सादिकमिया हरणमारे, श्री. कैलास शिंदे, श्री. निखिल सूर्यवंशी, श्री. शिवानंद चिकाळे, श्री. विष्णू कांबळे, वाजिद शेख आदींचा मोलाचा सहभाग होता.