Wednesday, April 30, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात इस्कॉनद्वारे अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीचा संगम

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चैतन्य बेस भक्त स्नेह मिलन २०२५ उत्साहात संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी इस्कॉन (ISKCON) तर्फे “श्री चैतन्य बेस भक्त स्नेह मिलन २०२५” या भक्तिमय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या इंद्रधनुष्य इमारतीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अध्यात्म, सेंद्रिय शेती आणि मानवतावाद यांचा सुंदर समन्वय पाहायला मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, तसेच इस्कॉनचे ठाणे, मुंबई, वृंदावन व लातूर येथून आलेले भक्तगण सहभागी झाले होते. 

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, “मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी अध्यात्माची साथ अत्यावश्यक असून, प्रत्येकाने काही ना काही आध्यात्मिक साधनेचे पालन करणे गरजेचे आहे.”

कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी इस्कॉनच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा गौरव करताना मानवतेसाठी अध्यात्म किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले.

विभागप्रमुख डॉ. राजेश कदम यांनी इस्कॉनच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडत सांगितले की, “जगभरात इस्कॉनचे सुमारे १५ लाख सक्रिय सदस्य असून, सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी इस्कॉन विशेष कार्यरत आहे. या कार्यात अनेक कृषी पदवीधर सहभागी होत आहेत. यामुळे मानवजीवन व पर्यावरण संरक्षणास मोठा हातभार लागत आहे.” तसेच त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील संदेश आचरणात आणण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात श्री तरुण नित्या प्रभुजी (गोवर्धन इको व्हिलेज), श्री देवानंद पंडित प्रभुजी (वृंदावन), श्री बलदेव प्रभुजी (मुंबई), डॉ. दिनानाथ प्रभुजी (परभणी), परमगोपाल प्रभुजी (लातूर), डॉ. सर्वेश्री माताजी आदी मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या स्नेह मिलनात परभणी येथील १०० हून अधिक भक्तांनी सहभाग नोंदवला. गीतापठण, कीर्तन, संवाद आणि सेंद्रिय शेती विषयक चर्चासत्र या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.