मृदा शास्त्रज्ञ डॉ.हरिहर कौसडीकर यांनी सुचविले जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धीचे उपाय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा ४३ वा भाग मा. कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ एप्रिल रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मृदा शास्त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर यांचेकडून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धीचे उपाय यावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी नमूद केले की, जमिनीमध्ये ४५% खनिज पदार्थ असून जमिनीस वापसा स्थिती येण्यासाठी २५% हवा आणि २५% पाण्याची गरज असते. यासाठी जमिनीमध्ये ५ % सेंद्रिय पदार्थांची आवश्यकता असते. मातीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर यामध्ये गोमूत्र, शेणखत, विविध कंपोस्ट खते , वर्मी कंपोस्ट यांचा नियमित वापर करावा, खत तयार करताना नीट कुजवलेले सेंद्रिय खत वापरणे महत्त्वाचे आहे. याबरोबरच हिरवळीची खते स्वतंत्र किंवा आंतरपिक यामध्ये धेंचा, देशी मूग, उडीद , तूर यासारखी पिके शेतात पेरून नंतर जमिनीत मिसळल्यास सेंद्रिय कर्ब वाढतो. विविध द्विदल पीकांची फेरपालट, शेतामध्ये शेळ्या मेंढ्या बसविणे, भूसुधारक वापरणे, पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी कुजवून जमिनीत मिसळणे, तेलबियापेंड, घरगुती व शेतीतील जैविक कचऱ्याचा योग्य वापर करून कंपोस्ट तयार करावे. जैविक घटकांचा वापर करून जैववर्धक जसे की जिवामृत, घनामृत, अमृतपाणी संजीवक, जिवाणू रायझोबियम, पीएसबी, अझॅटोवॅक्टर, ग्रीन अल्गी, ट्रायकोडर्माचा वापर आदी उपाय उपयुक्त ठरतात. विशेषतः रसायनांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळल्यास जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब दोन्ही वाढते, असे त्यांनी नमूद केले.
हवामान शास्त्रज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी हवामानामध्ये बदल होत
असून, तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाचे मागील आठवड्यामध्ये जाणवले,
परंतु पुढील चार दिवसात विशेषतः दिनांक २६, २७
आणि २८ एप्रिल रोजी मराठवाड्यात तापमान कमी होईल असा अंदाज आहे, असे सांगितले. याबरोबरच नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी
घेण्याचा सल्ला दिला. तसेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, फळ पिके, पशुधनाची योग्य काळजी घेण्याची गरज
असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७० हून अधिक शेतकऱ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून शास्त्रज्ञांना प्रश्न विचारले तसेच विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले. यावेळी शास्त्रज्ञांनीही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.