Tuesday, April 22, 2025

शाश्वत भविष्यासाठी निसर्गाचे संरक्षण करावे - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविच्या लातूर येथील कृषि महाविद्यालयात वसुंधरा दिनानिमित्त भव्य पर्यावरण जनजागृती महामेळावा संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील कृषि महाविद्यालय व एडीएम अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. (लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून भव्य पर्यावरण जनजागृती महामेळाव्याचे आयोजन दिनांक २२ एप्रिल रोजी (मंगळवार)  करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने सुमारे १,००० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन माध्यमातून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. उद्घाटन संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार श्री. प्रदीप नणंदकर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी श्री. मोहन गोजमगुंडे, श्री. चेतन जाधव, अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, एडीएमचे वाणिज्य विभागप्रमुख श्री. एम. बी. गाजरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “औद्योगिकरण, शहरीकरण व जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. हवामान बदल, पावसातील अनियमितता आणि भूजल पातळीतील घट यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.”

डॉ. भगवान आसेवार यांनी पर्यावरण सरंक्षणासाठी शाश्वत शेती तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित करत रुंद सरी वरंबा पद्धती, नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर, आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबाचे महत्त्व सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी "आपली ऊर्जा, आपली वसुंधरा" या संकल्पनेचे महत्त्व पटवून देताना सौर व पवन उर्जेचा शेतीमध्ये प्रभावी वापर करण्याची गरज सांगितली. महाविद्यालयाने २ लाख वृक्ष लागवड केली असून, “एक विद्यार्थी – पाच वृक्षहे अभियान दोन वर्षांपासून यशस्वीपणे राबवले जात आहे.

पर्यावरण विश्लेषक श्री. अतुल देऊळगावकर यांनी हवामान बदलाचे गंभीर परिणाम स्पष्ट करताना, शहरांमध्ये "उष्णतेची बेटं" निर्माण होत असल्याचे नमूद केले. वृक्ष लागवड हा उष्णतेचा मुकाबला करण्याचा प्रभावी उपाय असल्याचे ते म्हणाले.

डॉ. चिन्मयी देऊळगावकर (फूडचेन आयडी, मुंबई) यांनी शेतीतील प्रमाणीकरण आणि EUDR, प्रोटेरा प्रमाणीकरण, कार्बन क्रेडिट्स यासंबंधी सविस्तर माहिती दिली. शाश्वत शेतीसाठी योग्य पाणी व्यवस्थापन आणि जंगलतोड विरहित क्षेत्रातून उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित केले.

वरिष्ठ पत्रकार श्री. प्रदीप नणंदकर यांनी लातूरमध्ये सुरू असलेल्या सामाजिक वृक्षलागवड चळवळीचे महत्त्व सांगून, वृक्षलागवड ही केवळ मोहिम नसून एक सामाजिक जबाबदारी आहे, असे ठाम मत मांडले.

एडीएमचे एम. बी. गाजरे यांनी लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये १ लाख शेतकऱ्यांसोबत राबविण्यात येणाऱ्या शाश्वत शेती उपक्रमांची माहिती दिली. १५० हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सन २०२४-२५ मध्ये १.६५ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन श्री. दयानंद माने यांनी केले. आभार प्रदर्शन एडीएम अॅग्रोचे व्यवस्थापक श्री. अमोल ढवण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एडीएम अॅग्रो व कृषि महाविद्यालय लातूरच्या सर्व सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. कार्यक्रमस्थळी पुस्तक प्रदर्शन व विविध स्टॉलचेही आयोजन करण्यात आले होते.