Wednesday, April 30, 2025

‘जल व्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५’ समारोप सोहळा उत्साहात संपन्न; जल व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

 पाण्याचे योग्य व्यवस्थापन व बचत ही काळाची गरज... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

जलसंपदा विभागपरभणी व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल व्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५’ चा समारोप व गौरव सोहळा मोठ्या उत्साहात दिनांक ३० एप्रिल रोजी पार पडला. या कार्यक्रमात जल व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी सेवानिवृत्त सचिव जलसंपदा विभाग श्री. अजय कोहीरकर, परभणी महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. धैर्यशील जाधव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता व पालक अभियंता श्री इ. म. चिस्ती, कार्यकारी अभियंता श्री प्रसाद लांब (माजलगाव), श्री रुक्मानंद गरूड (गंगाखेड), श्री चंद्रशेखर तरटे (परभणी), मुंबई विद्यापीठाचे प्रा. बडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रकल्पाच्या कालव्यावर जलपूजन करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलनाने मुख्य समारंभास आरंभ झाला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पाणी हे प्रत्येक कृतीचे मूळ असून, त्याचे योग्य व्यवस्थापन व बचत हे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सिंचनासाठी पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांनी करावे व पाणी वापर संस्था यांचा प्रभावी वापर करावा. कृषी विद्यापीठ सदैव जल व्यवस्थापनासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन देण्यास तयार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी आगामी काळात जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रशिक्षणात कालवा सिंचन प्रणालीपासून पीक व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबींवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बोलतांना त्यांनी जलसंपदा विभाग यांचे विशेष अभिनंदन केले की, सिंचन व पाणी व्यवस्थापन बाबत कृषी क्षेत्राशी सर्व विभागांना एकच व्यासपीठावर एकत्र आणून कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण करण्याचे प्रयत्न केले व याच प्रमाणे सदैव पुढे हे कार्य चालत रहावे, अशा भावना व्यक्त केल्या.

सेवानिवृत्त सचिव श्री. अ. प्र. कोहीरकर यांनी आपल्या ४० वर्षांच्या अनुभवाद्वारे उपस्थितांना जल व्यवस्थापनाशी संबंधित धोरणे, कायदे (MMSIF, MWRRA) व अंमलबजावणीबाबत सखोल मार्गदर्शन केले. पाणी आवर्तनादरम्यान येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना कशा कराव्यात, याचीही माहिती दिली.

या कार्यक्रमास परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती नितीशा माथुर, व अपर जिल्हाधिकारी मा. डॉ. प्रताप काळे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. परभणी महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. धैर्यशील जाधव यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमास जलसंपदा विभाग, परभणीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सुमारे २०० शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जल व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची पायाभरणी करणारे ठरेल, असा विश्वास कार्यक्रमाच्या यशस्वीतेतून व्यक्त करण्यात आला.