वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या "शेतकरी देवो भव:" या नाविन्यपूर्ण
ऑनलाईन मालिकेचा सहावा भाग दिनांक २२ एप्रिल रोजी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व
प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या भागात
धाराशिव जिल्ह्यातील मौजे खानापूर (ता. परंडा) येथील प्रगतशील शेतकरी श्री. अंकुश
नाळे यांची कमी खर्चात प्रभावी कीड व्यवस्थापनाची यशोगाथा विद्यापीठाच्या
स्टुडिओतून सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सेंद्रिय शेती प्रकल्प
केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर
कीटकशास्त्रज्ञ डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी श्री. नाळे यांची सखोल मुलाखत घेतली.
श्री.
अंकुश नाळे यांनी कमी खर्चिक सेंद्रिय उपायांद्वारे कीड व्यवस्थापनाचे तंत्र
समजावले. त्यांनी आल्याच्या अर्काचा वापर करून नागअळी, भुरी, थ्रीप्स आणि कोळी यांसारख्या किडींचे प्रभावी
नियंत्रण कसे साधता येते, हे उलगडून सांगितले. तसेच हळद,
ताक आणि मीठ यांच्या मिश्रणाने डाळींबावरील तेल्या रोग, टोमॅटोवरील काळे डाग, आणि लिंबूवर्गीय पिकांवरील
कॅन्कर यांचे नियंत्रण शक्य असल्याचे उदाहरणासहित विशद केले.
यावेळी
श्री. नाळे यांनी सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळतो व ती
रासायनिक शेतीपेक्षा अधिक फायदेशीर ठरते, असे ठामपणे
सांगितले. त्यांच्या अनुभवातून शेतकऱ्यांना स्वखर्चात सेंद्रिय उपायांचा अवलंब
करून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रेरणादायी संदेश मिळाला.
कार्यक्रमाला
९० हून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील
शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या
विविध प्रश्नांना श्री. नाळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
"शेतकरी देवो भव:" उपक्रमातून शेतकरी ते शेतकरी संवाद घडून येत असून,
ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ झाली आहे. शाश्वत आणि सेंद्रिय शेतीकडे
नेणारा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.