– शुद्ध बियाणे उत्पादनावर भर देण्याचा निर्धार.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन संचालक कार्यालयांतर्गत बीज तंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या वतीने २६ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बियाणे दिन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपल्या जीवनातील तसेच अन्नसुरक्षा आणि शेती प्रणालीच्या शाश्वततेसाठी बियाण्यांचे महत्त्व अधोरेखित करणे हे होते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाची संकल्पना "डिस्कव्हरींग बोल्ड हॉरायझन्स" (Discovering Bold Horizons) अशी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, बियाणे हे शाश्वत
शेतीचे मूलभूत व अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. इतर सर्व शेतीसंबंधी घटकांचा परिणाम
बियाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. शेतकऱ्यासाठी बियाणे म्हणजे जीवन आहे.
त्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या करडई, तीळ व तुरीच्या
वाणांचे राष्ट्रीय पातळीवर वाढते महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः तुरीचा 'गोदावरी' वाण महाराष्ट्र, गुजरात
व मध्य प्रदेशात उच्च उत्पादन देत आहे, असेही त्यांनी नमूद
केले. तसेच त्यांनी सोयाबीन बीजोत्पादनात विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक
केले आणि शुद्ध व गुणवत्तापूर्ण बियाणे तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या
कार्यात शास्त्रज्ञांनी अधिक मेहनत घ्यावी, असे आवाहन केले.
तसेच, बियाणे वितरण व्यवस्था प्रभावीपणे राबवावी व सोयाबीन,
करडई, तुर आणि हरभरा यासारख्या महत्त्वाच्या
पिकांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सुचवले. याबरोबरच
कोणताही दिन साजरा करत असताना त्याविषयी भविष्यात अधिक प्रभावी कार्य करण्याचा
दृढनिश्चय करणे आवश्यक असते. यानुसार आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाच्या निमित्ताने
शेतकरी केंद्रित आणि शुद्ध बियाणे उत्पादनावर भर
द्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या प्रास्ताविकाने
झाली. संत तुकाराम महाराजांच्या "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या
ओवीचा संदर्भ देत त्यांनी शुद्ध बियाण्याचे महत्त्व स्पष्ट केले. निरोगी झाडे व
सकस आहारासाठी उच्च दर्जाच्या बियाण्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी अन्नधान्य, भाजीपाला, फळपिके तसेच पशुधनातील उत्कृष्ट गुणधर्म
असलेल्या वाणांचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
या कार्यक्रमात विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे
सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी व शास्त्रज्ञ मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे
यांनी केले, तर सहयोगी संचालक (बियाणे ) डॉ. हिराकांत
काळपांडे यांनी "शेतकरी देवो भव:" या भावनेतून गुणवत्तापूर्ण बियाणे
शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा दृढ संकल्प व्यक्त करत उपस्थितांचे मानले.