Wednesday, April 2, 2025

बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सामाजिक चळवळ आवश्यक – डॉ.जया बंगाळे

 शेंद्रा  येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिराची सांगता


आजची महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आजची मुलगी हीच उद्याची माता होणार असल्याने जन्मापासूनच त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर असल्याचे मत सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी शेंद्रा (ता. जिल्हा परभणी) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिराची सांगता समारंभात व्यक्त केले. मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी दिल्यास त्या स्वतः बरोबरच कुटुंबाचीही उत्कृष्ठपणे प्रगती करू शकत असल्याने त्यांच्या विवाहाची घाई करणे टाळावे. बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक गावात गावकऱ्यांनी व्यापक सामाजिक चळवळ उभारावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या विशेष शिबिराच्या सांगता समारंभास सरपंच श्रीमती आशामती ढगे, उपसरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जोंधळे यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी विषय प्रमुख डॉ.शंकर पुरी यांनी सामाज माध्यमाचा वापर शेती आणि घरातील कामासाठी करण्यासाठी महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालय द्वारे विकसित "महिला शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान" आणि "आरोग्यज्ञान" या दोन मोबाईल अॕपची उपयुक्तता आणि हाताळणी सांगून याचा वापर करण्याचे आवाहन केले.  

कार्यक्रम अधिकारी डॉ.विद्यानंद मनवर यांनी यावेळी उपस्थितांना प्रसार माध्यमे, सामाज माध्यमे तसेच कृत्रिम बुद्द्धीमत्ता या माध्यमांचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम याबाबत माहिती सांगून समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून या माध्यमांचा युवकांनी डोळसपणे वापर करावा तसेच या माध्यमाद्वारे सामाजिक तेढ निर्माण करणारी वा प्रसारित झालेली चुकीची माहिती वेळीच पडताळून त्यावर प्रतिबंध घालावा असे नमूद केले.

डॉ.अश्विनी बिडवे यांनी संतुलित आहाराचे महत्व सांगून विविध ऋतूनुसार आहारात बदल करणे, आहारात विविध पालेभाज्या,फळ-भाज्या, कडधान्ये तृणधान्ये यांचा संतुलित वापर तसेच वयोमानानुसार व कामाच्या स्वरुपानुसार आहार घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

प्रा.ज्योती मुंडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शारीरिक श्रम व वेळ बचत करण्याबाबत अ.भा.स.सं.प्रकल्प सामुदायिक विज्ञान महाविद्यालय निर्मित केलेल्या  शेतकरी महिलांचे  शारीरिक व मानसिक ताण कमी करणाऱ्या  विविध तंत्रज्ञानाची  सविस्तर माहिती दिली.

डॉ. संपदा ढगे यांनी आरोग्य विषयक माहिती देतांना आरोग्य हीच संपत्ती असल्यामुळे स्वतःच्या शरीराबद्दल जागरूक राहून आरोग्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असे विषद केले. याबरोबरच किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, मानसिक स्वास्थ्याची जपणूक, सुदृढ स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यानाचे महत्व याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले व उपस्थित महिला वर्गाचे शंका निरसन केले.

सहशिक्षिका श्रीमती रुपाली ढगे यांनी ‘व्यक्तिमत्व विकासात संवाद-कौशल्याचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्री. उत्तमराव जोंधळे यांनी लोकशाही संवर्धनासाठी युवकांनी संविधानिक मूल्यांचे जतन करीत एक सुजान नागरिक म्हणून कर्तव्ये पार पडण्याबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले. ग्रामसेवक श्री अतिश वायकोस यांनी यावेळी गावाच्या विकास योजना विषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी योग कार्यशाळा, वृक्ष व जल संवर्धन  जनजागृती रॕली, स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावातील स्वच्छता असे विविध उपक्रम राबविले. राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावाच्या सरपंच श्रीमती आशामती ढगे, उपसरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती स्वाती ढगे यांच्या समवेत सुधाकर ढगे,कामाजी जोंधळे, दिनाभाऊ ढगे,मुरली शिंदे, गोविंद रनेर, शेख गौस यांनी  प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अपूर्वा लांडगे यांनी केले. विशेष शिबिरांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमास गावातील महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.