वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन व
प्रशिक्षण केंद्राला पुणे येथील कृषि आयुक्तालयाच्या आत्मा योजनेचे संचालक माननीय श्री.
अशोक कीरनाळी यांनी दिनांक ३० एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी जिल्हा
परिषदेचे जिल्हा मोहिम अधिकारी श्री. सामाले व सेंद्रीय शेती प्रकल्पाचे प्रमुख
डॉ. आनंद गोरे यांची उपस्थिती होती.
माननीय श्री. अशोक कीरनाळी यांनी सेंद्रिय शेतीतील विविध प्रकल्पांची पाहणी
करत सविस्तर माहिती घेतली. त्यांनी सेंद्रिय टरबूज संशोधन प्रयोग, गांडुळ खत उत्पादन
युनिट, लाल कंधार गायींचा गोठा तसेच चारा पिके प्रक्षेत्र यांना
भेट देत त्यातील कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नैसर्गिक शेतीमध्ये गट शेती आणि शेतकरी
उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून निविष्ठा (इंपुट्स) निर्मिती व वापर यावर भर दिला
पाहिजे. तसेच कमी खर्चिक व प्रभावी निविष्ठांचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी
तांत्रिक मार्गदर्शन पोहचवणे आवश्यक आहे.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे केंद्रातील कार्यरत संशोधक व अधिकारी यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाल्याचे मत डॉ. आनंद गोरे यांनी व्यक्त केले.