Friday, January 31, 2025

यांत्रिकीकरणमुळे करडई उत्पादन झाले सोपे !... कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे ऑनलाईन कृषी संवादात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा एकतिसावा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३१ जमेवारी रोजी संपन्न झाला. 
कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांनी मानवत (जिल्हा परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री वसंतराव लाड यांच्या शेतीमध्ये ४० एकर वर पेरण्यात आलेल्या विद्यापीठाचे करडई  वाण पीबीएनएस १२ आणि पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) या दोन वाणाचा पाहणी केल्याचे नमूद करून या वाणाद्वारे शास्वत उत्पादन मिळते असे सांगितले. पुढे ते म्हणाले की, करडई पिकास फवारणी, काढणी व मळणी यंत्राच्या साह्याने होत असल्याने काढणी कारणे अवघड असल्याची या पिकाविषयीची धारणा बदलेली आहे. सध्या यांत्रिकीकरणमुळे करडई उत्पादन झाले सोपे झालेले आहे. याबरोबरच मानवी आहारात करडई तेल महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या वाणांमध्ये तेलाचे प्रमाण ३० टक्के असून उत्पादन बागायती मध्ये १८ ते २० क्विंटल तर कोरडवाहू  मध्ये १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. करडई पिकासाठी लागवडीचा खर्च कमी असून कोरडवाहू किंवा एक ते दोन पाण्याची उपलब्धता असल्यास बागायती पीक घेतले जाते. यामुळे करडई सारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे प्रतिपादन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे यांनी प्रास्ताविक करून फळ पिकांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार विद्यावेत्ता प्रा. अरुण  गुट्टे यांनी पिकामध्ये अनावश्यक तणनाशकाचा वापर टाळावा असे नमूद करून तणनाशकाच्या लेबलक्लेम विषयी माहिती दिली. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आठवड्यातील हवामानाचा अंदाज सांगून पिके आणि पशुधनाची घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली.

कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गिरधारी वाघमारे, डॉ. विश्वनाथ खंदारे, प्रा. अरुण  गुट्टे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. झगडे, डॉ. भवर यांच्यासह आंबेजोगाई येथील कृषी विभागाचे श्री पंडित काकडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सूत्रसंचालन विभाग प्रमुख प्रा अरुण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. 

शेतकऱ्यांच्या करडई प्रक्षेतत्रास माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांची भेट....

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्र मार्फत करडई उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटीचे दिनांक ३१ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ प्रवीण कापसे आदी उपस्थित होते. या भेटी दरम्यान मानवत (जिल्हा परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री वसंतराव लाड यांच्या शेतावर घेण्यात आलेल्या ४० एकर करडईचे पीकाची पाहणी त्यांच्या उपस्थितीत माननीय कुलगुरू यांनी केली.  श्री वसंतराव लाड हे प्रतिवर्षी अंदाजे ४० ते ५० एकर करडई पिकाची पेरणी करतात. करडई संशोधन केंद्रद्वारे प्रसारित वाण पीबीएनएस १२ आणि पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) या दोन वाणाची त्यांनी पेरणी केली असून हे दोन्ही वाण मराठवाडा विभागात लोकप्रिय झाले आहेत. या वाणांमधील तेलाचे प्रमाण ३० टक्के असून उत्पादन बागायती मध्ये १८ ते २० क्विंटल तर कोरडवाहू  मध्ये १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. करडई पिकासाठी लागवडीचा खर्च कमी असून कोरडवाहू किंवा एक ते दोन पाण्याची उपलब्धता असल्यास बागायती पीक घेतले जाते.

या भेटी दरम्यान  माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, करडई पिकास फवारणी, काढणी व मळणी यंत्राच्या साह्याने होत असल्याने काढणी कारणे अवघड असल्याची या पिकाविषयीची धारणा बदलेली आहे. करडईचे तेल सर्वोच्च दर्जाचे असून त्यास चांगला बाजार भाव देखील मिळत आहे. विशेष करून या पिकास पशुधनापासून तसेच जंगली प्राण्यापासून धोका उद्भवत नाही. याबरोबरच वाढते यांत्रिकीकरण यामुळे करडई या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांना या पिकाचे गुणवत्ता युक्त बियाणे आणि आवश्यक तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ तत्पर आहे. यामुळे करडई सारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे नमूद केले.

प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यासाठी करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. आर आर धुतमल आणि कृषि विद्यावेत्ता डॉ. एस. ए. शिंदे यांनी पुढाकार घेतला.





वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार हे 'आयएसडीए फेलो' म्हणून सन्मानित

 माननीय कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन

कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कुलसचिव श्री संतोष वेणीकर अभिनंदन करताना



मान्यवरांच्या शुभहस्ते ‘आयएसडीए फेलो’ प्रदान 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या कोरडवाहू शेतीसाठी मागील दहा वर्षात तंत्रज्ञान संशोधन आणि त्याच्या प्रसारातून साधलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना भारतीय कोरडवाहू शेती संस्थेद्वारे देण्यात येत असलेला राष्ट्रीय पातळीवर बहुमान ‘आयएसडीए फेलो’ म्हणून वर्ष २०२३ साठी सन्मानित केले. सदरील बहुमान भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था येथे भारतीय कोरडवाहू शेती संस्थेद्वारे दिनांक २९ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दिनांक २९ जानेवारी रोजी देण्यात आला. हा बहुमान त्यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषेदेचे महासंचालक तथा कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव मा डॉ. हिमांशु पाठक, आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क कटिबंधीय पिक संशोधन संस्थेचे (ICRISAT) महासंचालक मा. डॉ. स्टॅन ब्लेड, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनचे  (NRM)उपमहासंचालक मा. डॉ. एस के चौधरीकेंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे (CRIDA) संचालक डॉ. व्ही के सिंह यांच्या शुभहस्ते प्रदान केला गेला.

या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्रीप्रवीण देशमुख,  विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे उपस्थित होते.

डॉ. भगवान आसेवार यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्काराने २०१९ मध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना यापूर्वी राष्ट्रीय व राज्य पातळीवर केलेल्या कामाच्या योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय कृषि विद्या सोसायटी आयएआरआय नवी दिल्ली या सोसायटीचे  फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले होते. अन्नद्रव्य व्यवस्थापन, हवामान बदल, कोरडवाहू शेती, आंतरपीक पद्धती मुख्यतः सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी पद्धत, बागायती बीटी कापसासाठी लागवडीचे अंतर, खताची मात्रा आदी विषयावर संशोधन करून शिफारशी देण्यात डॉ. भगवान आसेवार यांचे मोलाचे योगदान आहे. मराठवाडयातील आठही जिल्ह्यासाठी हवामान बद्लानुरूप आकस्मिक योजना आराखडा तयार करणे तसेच हवामान बदल, कोरडवाहू शेती, दुष्काळाचे व्यवस्थापन याविषयावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्‍यांनी राबविले आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञास मिळालेल्या या राष्ट्रीय बहुमानामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञामध्ये चैतन्य जागृत झाले. या त्यांच्या यशाबद्दल संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



Thursday, January 30, 2025

वनामकृवित महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील यांची दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली. त्या अनुषंगाने त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या सिम्पोजीयम हॉलमध्ये दिनांक ३० जानेवारी रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालायांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन बाळगून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा अल्पपरिचय सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे यांनी करून दिला. 

मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा अल्पपरिचय

Wednesday, January 29, 2025

वनामकृविची विद्यार्थिनी गोदावरी जोशी सतराव्या कृषि विज्ञान काँग्रेस मध्ये राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत करणार मध्य विभागाचे प्रतिनिधित्व

 

राष्ट्रीय कृषि विज्ञान परिषद पुरस्कृत विभागीय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेचे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी आयोजिन करण्यात आले होते. विकसित भारतातील कृषितील नाविन्यपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयामधिल वनस्पती शरीर क्रिया शास्त्र विभागात पदव्यत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कुमारी गोदावरी जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला. ही विद्यार्थिनीं पंतनगर (उत्तराखंड) येथील गोविंदवल्लभ पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या सतराव्या कृषि विज्ञान काँग्रेस मधील राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कुमारी गोदावरीस मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे व मार्गदर्शक डॉ. गोदावरी पवार यांनी अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या

Tuesday, January 28, 2025

शेतकरी देवो भव: अंतर्गत प्रगतशील शेतकऱ्यांची मुलाखती द्वारे यशोगाथा...

 कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून वनामकृविचा नावीन्यपूर्ण उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विस्तार कार्यासाठी नियमित कार्यक्रमांसोबतच दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत आणि आठवड्यातून दोन वेळेस ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद यासारखे उपक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाला अधिक प्रभावी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि शेतकरी देवो भव: या भावनेतून प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा मुलाखती द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची मालिका महिन्यातून दोन वेळेस (मंगळवारी सायंकाळी .०० वाजता) सेंद्रीय शेती संशोधन प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. या मालिकेचा पहिला भाग दिनांक २८ जानेवारी रोजी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात यांची यशोगाथा शेतकऱ्यांसमोर त्यांच्या मुलाखती द्वारे सादर केली. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग उपस्थित होते.

यावेळी कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी म्हणाले की, विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी यांनी विद्यापीठाच्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या विस्तार कार्याची आणि विद्यापीठाने मागील दोन वर्षात प्रक्षेत्र विकसित करून बीजोत्पादन तिप्पट केल्यामुळे स्तुती करून अभिनंदन केल्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झाले. यामुळे शेतकऱ्यांप्रती अधिकाधिक समर्पित भावनेने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आणि शेतकरी देवो भव: या भावनेतून शेतकऱ्यांचे यशोगाथा मुलाखतीद्वारे  शेतकऱ्यांसमोर आणण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. याचा पहिला भाग संपन्न होत आहे याचा मनस्वी  आनंद होत असून भविष्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शाश्वत शेतीसाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी शेतकऱ्यांना देशी आणि विदेशी भाजीपाला पिकांचे गुणवत्तायुक्त बियाणे आणि रोपे उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.

सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांनी प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात यांची मुलाखत घेतली. यावेळी श्री पंडित थोरात यांच्या शेतीतील मिळविलेल्या यशाविषयी अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना थोरात यांनी नमूद केले की, प्रामुख्याने राजगिरा, जळगाव भरीत वांगे, काशीफळ भोपळा यासह भाजीपाला उत्पादनावर अधिक भर देतो. विशेषतः संपूर्ण वर्षाचे आणि वेळेचे नियोजन करून समाजातील व्यक्तींच्या गरजेनुसार शेती करतोशेती करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहून पूर्णतः सल्ला अवलंबतो. शेतमाल विक्रीसाठी मालाची प्रतवारी, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया, पॅकेजिंग या विद्यापीठाने ठरवून  दिलेल्या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब करतो. मालाची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेस प्राधान्य देतो. विक्री व्यवस्थापनासाठी सामाजिक माध्यमांचा विशेषतः व्हाट्सअप चा प्रभावी अवलंब करून व्यक्तींच्या गरजेनुसार ग्रुप बनवून त्यांना एक दिवस आधी विक्रीसाठी उपलब्ध उत्पादनाची माहिती फोटोसह ग्रुप वर पाठवतो. यामुळे शेती उत्पादनाची विक्री तात्काळ किंवा ऑनलाईनच बुक होऊन जाते.

यावेळी त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या प्रेमाच्या भावनेबद्दल आदर व्यक्त करून आभार मानले. यावेळी त्यांनी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांची वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल आभार मानले.

कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. सहभागी शेतकऱ्यांनी पंडितराव थोरात यांचे कौतुक करून विद्यापीठांनी त्यांची यशोगाथा पोहोचवल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. आभार व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ प्रवीण कापसे यांची विशेष उपस्थिती होती.

प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात यांची मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे

https://youtu.be/YOJeYecbMbU