Wednesday, January 21, 2026

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील जिमखाना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दिनांक १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

हे सर्व कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडले.

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या गौरवशाली इतिहासाचा संदर्भ देत सत्य, सहिष्णुता व धर्मनिरपेक्षतेची मूल्ये आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी व नैतिक मूल्यांचे भान जपावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविकात जिमखान्याचे डॉ. गजानन वसू यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्यांचे रक्षण तसेच अन्यायाविरुद्ध निर्भीड भूमिका या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

शहीदी समागम वर्षानिमित्त महाविद्यालयात चित्रकला, निबंध लेखन व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, शौर्य व धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे सर्जनशील व अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून इतिहास जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या निमित्ताने महाविद्यालय परिसरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी अमर रहें”, “धर्मस्वातंत्र्याचा जयघोष”, “सत्य व बलिदान अमर असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या रॅलीत प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

या कार्यक्रमास प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. सुमंत जाधव, डॉ. मधुकर मोरे, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. अनिकेत वाईकर, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. ओंकार गुप्ता, इंजी. शंकर शिवणकर व श्री राजाराम वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच जिमखाना सचिव डॉ. गजानन वसू, श्री प्रमोद राठोड व श्री हनुमंत ढगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण झाली असून मूल्याधिष्ठित, जबाबदार व सजग नागरिक घडविण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.