Friday, January 16, 2026

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी (सद्यस्थितीत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प), छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. सूर्यकांत पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महाविद्यालयात विविध साप्ताहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या गौरवशाली जीवनकार्यावर आधारित माहितीपट स्वरूपातील चित्रफितीचे प्रदर्शन, त्यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती देणारे बॅनर्स, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच समारोपाच्या दिवशी त्यांच्या कार्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या साप्ताहिक उपक्रमांचा एक भाग म्हणून आज दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी माहितीपट स्वरूपातील चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. यावेळी डॉ. दिलीप हिंगोले, दीप्ती पाटगावकर, श्री दत्तात्रय मुळे, डॉ. आशिष बागडे, डॉ. सुरेखा कदम व श्री रामेश्वर ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले. त्यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी व धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या महान बलिदानाचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी श्री तेजस घुगे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि तंत्र विद्यालय व फळ संशोधन केंद्र येथील अधिकारी, कर्मचारी तसेच प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित विचार, सहिष्णुता व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.