Monday, January 26, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आविष्कार–२०२६ महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन संमेलनाचे भव्य आयोजन

परभणी कृषि विद्यापीठाला राज्य संशोधन संमेलनाचे आयोजनाची संधी ही अभिमानाची बाब - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय लोकभवन कार्यालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे आविष्कार–२०२६ अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. हा संशोधन महोत्सव दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या संशोधन महोत्सवात महाराष्ट्रातील कृषि  व अकृषि अशा एकूण २६ विद्यापीठांतील सुमारे ३८० संशोधक विद्यार्थी, ५२७ संशोधक विद्यार्थिनी असे ९०७ विद्यार्थी, तसेच १३० प्रतिनिधी यामध्ये संघ व्यवस्थापक व विद्यार्थी कल्याण संचालक, परीक्षक यांचा समावेश (विद्यार्थी व प्रतिनिधी एकूण १०३७ )असून विविध विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १५०० हून अधिक व्यक्ती या संमेलनात सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन क्षमतेचे सादरीकरण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

या संमेलनाच्या उद्घाटन व समारोप समारंभासाठी राज्यातील तसेच देशातील मान्यवर शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता क्रीडा संकुल, विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय परिसर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव  माननीय श्री. विकासचंद्र रस्तोगी (भा.प्र.से.), तसेच माननीय राज्यपाल (महाराष्ट्र राज्य) यांचे  प्रधान सचिव माननीय डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.), नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, नागपूर येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. नितीन पाटील हे प्रमुख अतिथी आहेत. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री संजयसिंह चव्हाण (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक माननीय श्री रवींद्रसिंह परदेशी (भा.पो.से.), माननीय राज्यपाल यांचे शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय श्री विकास कुलकर्णी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री अनंत कदम, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यासोबतच विविध विद्यापीठांचे वरिष्ठ अधिकारी व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

तसेच समारोप समारंभ शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देखील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार आहेत.

समारोप समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह, प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ शरद गडाख, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त माननीय श्री जितेंद्र पापळकर (भा.प्र.से.) हे प्रमुख अतिथी म्हणून राहणार आहे. तसेच विविध विद्यापीठाचे सर्व संचालक आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या संशोधन संमेलनामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक आपल्या नाविन्यपूर्ण संशोधन सादरीकरणाद्वारे सहभाग नोंदवणार आहेत. नव्या संशोधनाला प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच कृषी व संलग्न क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या संशोधन महोत्सवासाठी पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक, सातारा, अमरावती, अकोला, जळगाव, नांदेड, राहुरी, सोलापूर, गडचिरोली आदी भागांतील विद्यापीठांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोपक्रमशील विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘आविष्कार’ हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. आविष्कार–२०२६ संशोधन संमेलनाच्या माध्यमातून राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी एकत्र येऊन आपले संशोधन कार्य सादर करतील, ही बाब निश्चितच ज्ञाननिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला या राज्यस्तरीय संशोधन अधिवेशनाचे आयोजन करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, या माध्यमातून मराठवाडा विभागातील शैक्षणिक व संशोधन संस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला

आविष्कार–२०२६’ अंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी खालील सहा प्रमुख विषय विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत —

1.        मानवविद्या, भाषा व ललित कला

2.        वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा

3.        शुद्ध विज्ञान

4.        कृषी व पशुसंवर्धन

5.        अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

6.        वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र

स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच पीएच.डी. / पोस्ट पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

‘Innovation, Invention, Discovery’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या राज्य स्तरावरील आविष्कार–२०२६ संशोधन संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सह निमंत्रक तथा आजोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ प्रशासन, आयोजन समिती, विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत. मराठवाडा विभाग तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासाठी हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत गौरवाचा ठरणार असून, आविष्कार–२०२६ संशोधन संमेलन या राज्यस्तरीय महत्त्वाच्या संमेलनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कार्यास नवी दिशा व नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे..