Friday, February 28, 2025

कृषि विज्ञान केंद्रांनी ‘मालआधारित’ कृती आराखडा राबवावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी कार्यशाळेचा यशस्वी समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय आणि अटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप २८ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री संतोष वेणीकर,  मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कार्यशाळेतील मंथनातून निघालेल्या मुद्द्यांवर समाधान व्यक्त करून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कृषि विज्ञान केंद्रांच्या आगामी कृती आराखड्यात कृषि माल आधारित (Commodity Base) दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित कृती आराखडा तयार करून पीक, पशुधन, रेशीम, मधुमक्षिका अशा विविध घटकांवर उद्योजकता विकासावर भर द्यावा. यामध्ये यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञानाचा समावेश करून शेतकरीहित साधण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

"शेतीसाठी जशी पाण्याची गरज आहे, तशीच ज्ञानाचीही गरज आहे. हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य कृषि विज्ञान केंद्रांनी करावे. तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबत पीकनिहाय शाश्वत उत्पादनासाठी मानके आणि मापदंड निश्चित करावेत. तसेच प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने एक विशेष कार्यक्षेत्र ठरवून आपली वेगळी ओळख निर्माण करावी," असेही कुलगुरूंनी मार्गदर्शन करताना सांगितले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी या कार्यशाळेतील सर्व ठरावांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत मराठवाड्यातील १२ कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि विषयतज्ज्ञांनी सहभाग घेतला. या केंद्रांनी मागील वर्षभर केलेल्या कार्याचा अहवाल तज्ज्ञांसमोर सादर केला. या अहवालांवर सखोल चर्चा झाली आणि विविध विभागांच्या कार्ययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, तसेच विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. प्रफुल्ल घंटे, शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले, तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकरीहिताच्या दृष्टीने ठोस आराखडा आखण्यात आला असून, कृषि विज्ञान केंद्रांद्वारे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

वनामकृविच्या एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्रास राष्ट्रीय पातळीवरील सहा पुरस्कार जाहीर

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून मिळाले यश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र या कार्यालयास राष्ट्रीय पातळीवरील सहा पुरस्कार प्राप्त. सदरील पुरस्कार मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाने (FSRDA) जाहीर केले आहेत. एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे कार्य माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले जात आहे. या पुरस्कारामध्ये मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांना एफएसआरडीए फेलो पुरस्कार तसेच या प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे, श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. जनार्धन अवर्गंड आणि श्री. रत्नाकर ढगे यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार आणि या प्रकल्पावर सादर केलेल्या प्रबंधास उकृष्ट प्रबंध पुरस्कार असे एकूण सहा पुरस्कार मिळाले आहेत.

सदरील पुरस्कार मोदीपुरम येथे दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय  एकात्मिक शेती पद्धती परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, असे शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाद्वारा कळविण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी दिली.

एखाद्या संशोधन केंद्राला एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पुरस्कार मिळाल्यामुळे शास्त्रज्ञामध्ये चैतन्य निर्माण झाले. पुरस्कार विजेते शेतकरी यांनी हवामान बदल, बाजार भावातील चढ उतार, जमिनीचे खालावलेले आरोग्य या पार्श्वभूमीवर एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून एकीकडे शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढविले तर दुसरीकडे रोजगार निर्मिती आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन करण्यात मोठे कार्य केले आहे. याबरोबरच सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून एकीकडे लागवडीवरील खर्च कमी करून विषमुक्त शेत उत्पादन घेतले आणि जमिनीचे आरोग्य  सुधारण्याचे कार्य केले. त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र या कार्यालयाचे नेहमीच मार्गदर्शन लाभले.

सदर शेतकरी बांधवांचे प्रस्ताव तयार करण्यात आणि पाठविण्यासाठी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग  आणि प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शरद चेनलवाड, डॉ. सुदाम शिराळे, श्री. मिर्झा, श्री. दुतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


वनामकृवितील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

 व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन ठेवावे!.. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते डॉ. गिरधारी वाघमारे यांचा सत्कार 

वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, सहाय्यक नियंत्रक श्री. शेख मकसूद अहेमद मैनोद्दीन आणि लघु लेखक श्री अनिल प्रभाकरराव खोटारे हे नियत वयोमानानुसार २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. यानिमित्त त्यांना विद्यापीठाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सत्कारमूर्तीं डॉ. गिरधारी वाघमारे, श्रीमती दिशा गिरधारी वाघमारे, सत्कारमूर्तीं श्री. शेख मकसूद, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आपण सर्व दिन साजरे करतो आपली संस्कृती आहे. आपण जन्मलो की आपल्या निवृत्तीचा दिनांक ही ठरलेला असतो आणि त्यानुसार निवृत्त व्हावेच लागते. परंतु दरम्यानच्या काळात अनेक मोठ्या संस्था सोबत कार्य केलेले असते.पली संस्कृती आहे की त्यांच्याद्वारे होणारे सन्मान, सत्कार हेच आपले अस्तित्व महत्त्वाचे आहे हे सिद्ध करते. यानुसार डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या निरोप समारंभातील उत्साह म्हणजेच त्यांचे  विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य होते हे सिद्ध होते. त्यांनी विद्यापीठाच्या कार्यामध्ये झोकून देऊन समर्पण भावनेने कार्य केले. त्यांनी शिक्षण, संशोधन, विस्तार आणि प्रशासकीय कार्य प्रभावीपणे निभावले. शेवटच्या दिवसापर्यंत ही कार्य करून मराठवाडा स्तरीय कृषि विज्ञान केंद्राच्या पुढील वर्षासाठीच्या कृती आराखड्यासाठी कार्यशाळा आयोजन करून विस्तार कार्याची नियोजन करून दिले. त्यांचे व्यक्तिमत्व प्रसन्नमुद्रेचे असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती कार्यभाव सतत झळकताना दिसतो असे गौरव उद्गार माननीय कुलगुरू यांनी त्यांच्या प्रति केले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी श्री. शेख मकसूद यांच्याप्रतीही आदरयुक्त वक्तव्य करून ते सरळ स्वभावाचे आणि कार्यंमग्न व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. याबरोबरच श्री अनिल खोटारे हे देखील आपल्या कार्याशी बांधील असल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन केले.

त्यांनी सुखदुःखाची देवाण-घेवाण करण्यासाठी व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन ठेवावे, इतरत्र न पाहता कार्य मग्न राहून स्वतःच्या कार्यावरती प्रेम करावे. सतत जीवनामध्ये आनंदाचे क्षण शोधावेत, असा प्रेरणादायी सल्ला सर्व उपस्थितांना दिला.

सत्कारमूर्ती डॉ. गिरधारी वाघमारे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिलेल्या आजपर्यंतच्या विविध जबाबदाऱ्यासाठी आणि माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली कमी कालावधीत उत्कृष्ट कार्य करण्याची संधी मिळाली याबद्दल  आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वतःचा शालेय जीवनापासून ते निवृत्ती पर्यंतचे अनुभव आणि कार्य विशद केले. व्यवसायिक आणि कौटुंबिक आठवणींना उजाळा देत असताना ते थोडेसे भावूक झाले. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला या मुळे मी यशस्वी कार्य करू शकलो असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सेवानिवृत्तीचे सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून दिल्याबद्दल त्यांनी कुलसचिव आणि नियंत्रक कार्यालयाचेही विशेष आभार मानले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी डॉ. गिरधारी वाघमारे यांच्यासोबत असलेल्या दीर्घकालीन कार्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. याबरोबरच श्री  शेख मकसूद आणि श्री अनिल खोटारे यांचेही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी नमूद केले की, डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या कार्यात नाविन्यपूर्णता असायची. त्यांच्याकडून अनेक बाबी शिकण्यास मिळाल्या त्याचा माझ्या सेवेमध्ये लाभ होत आहे, असे नमूद करून त्यांना तसेच श्री शेख मकसूद व अनिल खोटारे यांना शुभेच्छा दिल्या

कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी डॉ. गिरधारी वाघमारे यांच्यासोबत कार्य करत असतानाचे अनुभव सांगून त्यांच्या कार्याची स्तुती केली. त्यांनीही आजच्या तीनही सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विस्तार शिक्षण संचालनालयामध्ये डॉ. गिरधारी वाघमारे यांचा सोबत कार्य करण्याचा कालावधी केवळ तीन महिनेच लाभला. यातून ते शिस्तप्रिय असून कार्यास दिशा देणारे होते हे प्रकर्षाने जाणवले. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सतत शास्त्रज्ञ म्हणूनच कार्य करत होते असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम समन्वयिका डॉ. दीप्ती पाटगावकर आणि डॉ. एस. व्ही. सोनुने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले तर आभार डॉ. हनुमान गरुड यांनी मानले.





माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते श्री. शेख मकसूद अहेमद मैनोद्दीन यांचा सत्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते श्री अनिल खोटारे यांचा सत्कार

वनामकृवितील कर्मचारी कवी पांडुरंग वागतकर यांची कविता 'करपलेली खोळ' दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवडली

 कवीच्या पाठीवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची कौतुकाची थाप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचारी आणि कवी श्री. पांडुरंग वागतकर यांच्या "करपलेली खोळ" या कवितेची निवड दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या विशेष सत्रासाठी करण्यात आली होती. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे कवी वागतकर यांनी ही हृदयस्पर्शी कविता सादर केली.

या कवितेतून कवीने दुष्काळामुळे शेतकऱ्यांना भोगावे लागणारे हाल दर्शवले आहेत. त्यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे:

गोट्यावरच्या पाचटाला चघळुन पोटाची आग विजवते गाय,
कनगिच्या तळाला घरासाठी भाकर शोधते माय.

आटलेल्या विहीरीवर चिखलाचा हुंगते गाय,
हंडाभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते माय.

या ओळींमधून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा अतिशय प्रभावीपणे मांडल्या आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेने विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य सातत्याने करत आहे. विद्यापीठातील कर्मचारी पांडुरंग वागतकर यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या या काव्यप्रतिभेची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कवी वागतकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, उपकुलसचिव श्री. पु. को. काळे यांनीही कवी पांडुरंग वागतकर यांचे अभिनंदन केले.

कवी वागतकर यांनी आपल्या कवितेतून दुष्काळग्रस्त जनजीवनाचे वास्तव मांडत, शेती आणि शेतकऱ्यांची होणारी अवस्था समोर आणली आहे. त्यांनी पुढे लिहिले आहे:

दुष्काळात गेलेल्या वासरासाठी गोठ्यात हंबरते गाय,
आटला पाना जरी स्थनातून रक्त पाजते माय.

या ओळींमधून दुष्काळी परिस्थितीत जनावरांवर आणि कुटुंबांवर होणारे परिणाम कवी वागतकर यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केले आहेत. त्यांच्या या कवितेने मराठी साहित्य संमेलनात उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


पी. डी. जैन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती

 

परभणी येथील पी डी जैन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या शैक्षणिक वर्ष २०१८ – १९ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ दिनांक २८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उदयराजजी जैन हे होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे, परभणी येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. अप्पाराव शेळके आदींची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्तिमत्व विकासातील विविध पैलू विद्यार्थ्यांना सांगितले. कठोर मेहनत, स्वयंशिस्त, प्रामणिक प्रयत्न, करून स्वतःला जीवनात आदर्श व्यक्तिमत्व बनवावे. विद्यार्थ्यानी संस्कार, नीती, मुल्ये जपावेत आणि वडीलधाऱ्या व्यक्तिंचा मान ठेवण्याचे आवाहन केले. कृषि विद्यापीठांमध्ये होमिओपॅथिक शास्त्रासोबत संशोधन करण्यास विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल, यासाठी विद्यार्थांनी विद्यापीठास भेट द्यावे असे नमूद केले. कार्यक्रमात माननीय कुलगुरू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभाडे यांनी करून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठासोबत कार्य करून होमिओपॅथीशास्त्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी संशोधन करण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील इंटरशीप मधील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी तथा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत कार्यरत प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत  २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी  विज्ञानावर आधारीत प्रकल्प तयार  करुन आणले  तसेच त्यांनी त्यांच्या  प्रकल्पाची माहिती उपस्थितांना सांगितली. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता आणि मानव विकास विभाग प्रमुख डॉ. जया बंगाळे यांनी शाळेत आयोजित प्रदर्शनास भेट देऊन या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या  प्राध्यापिका, प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या समन्वयिका डॉ. वीणा भालेराव यांनी दि. २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून का साजरा करण्यात येतो, या विषयी माहिती देतांना असे विशद केले की डॉ. सी.व्ही. रामन यांनी विज्ञान क्षेत्रातील प्रकाशाविषयी मोठा शोध लावला, जो "रामन इफेक्ट"  म्हणून ओळखला जातो. या महान शास्त्रज्ञाच्या या संशोधनाची आठवण म्हणून हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कार तसेच भारतरत्न पुरस्कार याबददल ही त्यांनी यावेळी माहिती दिली. याप्रसंगी  प्रा. प्रियंका स्वामी तथा शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका श्रुती औंढेकर यांनी केले.


Thursday, February 27, 2025

सायन्स कॉलेज, नांदेड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या वतीने आयोजित ग्रामीण विकास, शाश्वत पर्यावरण आणि शेतीमध्ये लिंग सक्षमीकरणातील उदयोन्मुख ट्रेंड्स’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. या परिषदेला ३०० हून अधिक मान्यवर, विद्वान व तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, धोरणात्मक सुधारणा आणि लिंग समानतेचे महत्त्व अधोरेखित केले. तज्ज्ञांनी पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी स्त्री-पुरुष समानतेला चालना देणाऱ्या धोरणांची गरज व्यक्त केली.

परिषदेत ग्रामीण विकास, शाश्वत पर्यावरण आणि कृषी क्षेत्रातील समतोल वाढीवर व्यापक चर्चा झाली. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवीन संकल्पना मांडल्या आणि कृषी क्षेत्राला प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन दिशा देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पोषक भरड धान्य लागवड कार्यशाळा संपन्न

 भरड धान्याचे आहारात विशेष महत्व!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या हैदराबाद येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (ज्वार व श्री अन्न) आणि परभणीच्या ज्वार संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उप प्रकल्प अंतर्गत "पोषक भरड धान्य लागवड" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा २७ फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

कार्यशाळेला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, तसेच हैदराबाद येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. मधुसुधन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. भरड धान्याचे आहारात विशेष महत्व आहे असे नमूद करून त्यांनी भरड धान्यांच्या आहारातील महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यापीठाने विकसित केलेल्या 'परभणी शक्ती' (ज्वार) आणि 'एएचबी १२०० व एएचबी १२६९' (बाजरी) या जैव संपृक्त वाणांची महत्ता स्पष्ट केली. यामध्ये लोह व जस्त यांसारख्या पोषकतत्त्वांचे प्रमाण अधिक असल्याने ही वाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच भरड धान्य लागवडीसाठी अधिक संशोधन आणि विस्तारकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पामार्फत या क्षेत्राला आवश्यक आर्थिक सहाय्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य शास्त्रज्ञाना लाभत आहे. तेव्हा शास्त्रज्ञानी आणि शेतकऱ्यांनीही या संधीचे सोने करावे असे प्रतिपादन केले .

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी शास्त्रज्ञांनी चिकाटीने संशोधन करत ज्वारीचे क्षेत्र वाढवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच, प्रकल्प समन्वयक डॉ. मधुसुधन यांनी ज्वार संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात दुय्यम भरड धान्यांवर अधिक प्रात्यक्षिके घेण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनुसूचित जाती उप प्रकल्पाच्या ५० लाभार्थ्यांना शेती साहित्याच्या किट वितरीत करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्वार पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे यांनी केले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार, डॉ.अनंत लाड आणि डॉ. रामप्रसाद खंदारे यांची उपस्थिती होती

सूत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. महेश दडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. गणपत कोटे, कृषि विभागाच्या श्रीमती स्वाती घोडके तसेच ज्वार संशोधन केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखडाच्या कार्यशाळेचे विद्यापीठात उद्घाटन

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संबंधित सर्व संस्थांनी एकजुटीने कार्य करावे!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विस्तार शिक्षण संचालनालय आणि अटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि म्हणाले की, कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आराखडा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्य करत असल्याने शेतकऱ्यांशी अतिशय जवळीक साधून त्यांची उन्नती साधण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून कृषि विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आनंद मिळतो. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची उन्नतीसाठी कृषि संबंधित सर्व संस्थांनी एकजुटीने आणि आपुलकीने कार्य करावे. यामध्ये विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असून त्यांना या पदाचा अतिशय अल्पकाळ मिळाला, परंतु त्यांनी उत्कृष्ट कार्य केले असे नमूद करून माणूस कार्यरूपीच आठवणीत राहतो असे त्यांच्या प्रती गौरव उद्गार काढले. विद्यापीठ आणि अशासकीय संस्थांद्वारे संचलित कृषि विज्ञान केंद्र यांचे कार्य उत्कृष्ट असून त्यांनी समाधान व्यक्त केले. देश पातळीवरील सर्व कृषि विज्ञान केंद्राच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनेही ४८ व्या कुलगुरूंच्या अधिवेशनात चर्चा करण्यात आली असून त्या सर्व सोडण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

कृषि विज्ञान केंद्र हे शासनाच्या योजना तसेच विद्यापीठाद्वारे विकसित तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले पाहिजे. कृषि विज्ञान केंद्रांनी किमान पाच गावे दत्तक घेऊन त्या ठिकाणी अधिकाधिक योजना आणि विस्तार कार्यक्रम आयोजित करून त्या गावास आदर्श गाव बनवावे. याबरोबरच कृषि विज्ञान केंद्रांनी शासनाच्या सर्व योजना आणि अनुदानाचा प्रभावी वापर शेतकऱ्यांसाठी करावा. असे प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाच्या तूर, हरभरा वाणाची स्तुती देशपातळीवर होत आहे, या बाबीचा सदुपयोग करावा. विद्यापीठ केवळ पिकांचे वाण देत नसून त्यासोबत शाश्वत उत्पादनासाठी योग्य ते मापदंड / मानके ठरवून देत आहे. शास्त्रज्ञांनी साधक – साध्य -साधन यांचा समतोल ठेवून शेतकऱ्यांची उन्नती साधावी. शेतकऱ्यांना प्राथमिक तंत्रज्ञान आणि विक्री कौशल्य शिकवावे. शेतकऱ्यांना खरेदी बाजार व्यवस्थेपेक्षा  विक्री व्यवस्था आधारित विपणन कौशल्य महत्त्वाचे आहे. यातून शेतकरी त्याच्या मालाचा भाव ठरवेल. शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, वापर ड्रोन-तंत्रज्ञान यांचा वापर, तसेच हवामान अनुकूल तंत्रज्ञान याबद्दल अधिक माहिती शेतकऱ्यांना अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेत द्यावी. तंत्रज्ञान अवलंबनामधील माहिती - ज्ञान - अवलंबन हे टप्पे महत्त्वाचे असून याचे विस्तार कार्यात प्रभावी वापर करावा. परभणी कृषि विद्यापीठाद्वारे सर्व पिकांचे तंत्रज्ञानाचे आदर्श पद्धती विकसित करून राष्ट्रीय पातळीवरील त्या अवलंबल्या जातील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

प्रस्ताविका विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी मागील वर्षातील कृषि विज्ञान केंद्रांचे कार्य आणि विविध भागधारकांनी दिलेल्या प्रत्याभरणावर पुढील वर्षात करण्यात येणाऱ्या कार्याचा अहवाल सादर केला.

या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, डॉ. राजेश  क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. प्रफुल्ल घंटे, शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे, आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत मराठवाडा कार्यक्षेत्रातील सर्वच बाराही कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक आणि विविध विषयाचे विषय विशेषज्ञ यांनी सहभाग नोंदविला. ते सर्व मागील वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल, शेतकऱ्याद्वारे आलेले प्रत्याभरणे आणि भविष्यातील कामाचा कृती आराखडा सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. एस. व्ही. चिक्से, आणि प्रा. व्ही. बी. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार  कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले.







परभणीच्या बालवैज्ञानिकांची 'विज्ञानवारी' आयुका (पुणे) ला रवाना

 माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून या विज्ञान वारीला शुभेच्छा...




ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयुका, पुणे येथे विज्ञानवारी उपक्रमांतर्गत नेण्यात येते. यावर्षी परभणी येथील  आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथून दिनांक २७ फेब्रुवारीला सर्व विद्यार्थी आयुका पुणे कडे रवाना झाले ते २८ फेब्रुवारी रोजी तेथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार आहेत.

या विज्ञान वारीला शुभेच्छा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथून निघण्याच्या अगोदर सकाळच्या सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथुर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या विज्ञान वारीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना 'संधीचे सोने करा' असे सांगून शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांनी विद्यार्थ्यांना 'Ask why?' हा मंत्र दिला. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना व त्यामागची कारणे यांबद्दल आपल्याला प्रश्न पडून तो विचारून यांचा शोध घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (योजना) डॉ श्री संजयजी ससाने, ज्ञानोबा नाईक, सौ अंजली बाबर, डॉ केदार खटिंग आदींची उपस्थिती होती.

या विज्ञान वारीद्वारे अती दुर्गम भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्यामधील संशोधन वृत्तीचा विकास होवून त्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने पुण्याच्या IUCCA आणि NCRA या दोन्ही संस्थांना मागील तेरा वर्षांपासून परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या विद्यार्थ्यांना जोडून देण्याचा प्रयत्न करत असते. याद्वारे समाजामध्ये विज्ञानाविषयी जागृती निर्माण होईल व भारताला नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

विज्ञानवारीतील विद्यार्थ्यांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येते. यावर्षी विज्ञानवारी तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. पहिला टप्पा दिनांक १७ फेब्रुवारी रोजी शालेय स्तरावर घेण्यात आला. यात ऑफलाइन परीक्षेत २७९ शाळा व ऑनलाईन परीक्षेमध्ये २५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या पहिल्या टप्प्यातून एकूण १८० विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आले. यात एकूण ९ तालुक्यांमध्ये २० फेब्रुवारीला परीक्षेचा दुसरा टप्पा घेण्यात आला. या परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरले. प्रात्यक्षिक परीक्षा ही आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे २३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेत एकूण ६३ विद्यार्थी विज्ञानवारी परीक्षेसाठी निवडण्यात आले.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री सुधीर सोनुनकर, प्रास्ताविक डॉ रामेश्वर नाईक यांनी केले तर आभार डॉ पी आर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ बाहुबली निंबाळकर, प्रताप भोसले, डॉ रणजीत लाडप्रसाद वाघमारे, दत्ता बनसोडे, दीपक शिंदे, महेश शेवाळकर, अशोक लाड, नागेश वाईकर, संदीप लष्करे, प्रकाश डुबे, लक्ष्मण सोनवणे, गजानन चापके, अविनाश रेंगे, माजिद भाईसौ कमल पाटील, सौ जयश्री चोपडे आदींनी परिश्रम घेतले.









सौजन्य - ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणी

Wednesday, February 26, 2025

विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे!...माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 शिवजयंती महोत्सवानिमित्त वनामकृविच्या लातूर येथील महाविद्यालयात सांस्कृतिक स्पर्धेला  प्रारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. या महोत्सवात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांच्या अध्यक्षेतेखाली दिनांक २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. श्रीमती जयश्री मिश्रा आणि शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार हे प्रमुख अतिथी होते. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिनेशसिंह चौहान, प्रभारी अधिकारी डॉ.मोहन धुप्पे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.वसंत सूर्यवंशी, डॉ.अरुण गुट्टे, डॉ.व्यंकट जगताप, डॉ.अच्युत भरोसे, डॉ.विजय भामरे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, शिवरायांच्या विचारांचा वारसा आपल्याला लाभलाय म्हणून ही भूमी पवित्र आहे. शिवरायांनी  मोजक्याच साधनामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आहे त्या  संधीचा सुयोग्य वापर करून अनेक नवनवीन संधी निर्माण केल्या. आज अनेक नवनवीन क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत. कृषि महाविद्यालय, लातूरचा परिसर हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पोषक असून हा विभाग माझ्या सदैव पसंतीचा आहे, अशी शाबासकीची थाप देवून  विद्यार्थ्यांनी  योग्य शिक्षण  आणि  शिवरायांचा आदर्श  घेवून  कुठल्याही क्षेत्रात जाऊन संधीचे सोने करा असेही ते म्हणाले.

शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण शारीरिक व मानसिक विकासासाठी  सांस्कृतिक स्पर्धांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अध्यायनासोबतच सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्याकरिता विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.

यानंतर  बहारदार  गायनशास्त्रीय, पाश्चात्य  नृत्य, भारताच्या विविध प्रदेशांच्या लोकनृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.  मान्यवरांच्या हस्ते  कृषि महाविद्यालय, लातूर  व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या  विजेत्या स्पर्धकांना  चषक, पदक व प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन सानिका करपे  व अंजली  सौम्या  यांनी तर  आभार डॉ.विजय भामरे  यांनी मानले. कृषि महाविद्यालय, लातूर  व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने सांस्कृतिक महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.