Saturday, February 1, 2025

शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व आणि तंत्रज्ञान याविषयी लघु अभ्यासिकेत माननीय कुलगुरू मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन...

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत  शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व आणि तंत्रज्ञान या विषयावरील २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान दहा दिवशीय लघु अभ्यासिकेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  दिनांक ३१ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजीयम सभागृहामध्ये मा.कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या अभ्यासिकेत संपूर्ण भारतातून सहभागी असलेल्या २५ प्रशिक्षणार्थीना आणि विभागाचे आचार्य आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

मार्गदर्शनपर भाषणात मा.कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सद्य परिस्थितीमध्ये शेती मध्ये यांत्रिकीकरणाचा महत्व असुन विद्यापीठामध्ये यांत्रीकरणातून मागील दोन वर्षांमध्ये ८०० हेक्टर जमीन लागवडी खाली आणून बिजोत्पादानात तिप्पट वाढ झाल्याचे सांगितले. शेतीसाठी पाण्याचे महत्त्व जाणून विद्यापीठात एक कोटी लीटर क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले. त्याचा उपयोग रब्बी तसेच उन्हाळी प्रयोगासाठी व बीजोत्पादनासाठी होत आहे. सध्या परिस्थितीमध्ये ड्रोन, रोबोट यांचाही वापर वाढवावा लागेले. विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसाठी विविध विस्तार कार्याचे उपक्रम राबवीत असून याची दखल राज्य आणि देशपातळीवर घेतली जाता आहे. यामध्ये ‘माझा एक दिवस बळीराजा सोबत’ आणि ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि सवांद नियमित करत असून विद्यापीठ शेतकरी देवो भव: याभावानेतून पुढे जात आहे. विद्यापीठामार्फत संशोधित केलेल्या गोदावरी तुर शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले व शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा एक स्त्रोत झाले असून यापासून एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळाल्याच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. या वाणास ऊसाला पर्याय म्हणून शेतकरी पाहत आहेत. हरभरा पिकामध्ये जमिनीपासून 30 सेंटीमीटरच्या वरती दाणे भरणाऱ्या वाणादेखील विकसित केलेला असून काढणीच्या वेळी यांत्रिकीचा वापर करणे शक्य झाले आहे. ड्रोन द्वारे विविध पिकांच्या फवारणी करता पिकानुसार त्याच्या राष्ट्रीय पातळीवर मापदंड ठरविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी ते स्वतः इतर शास्त्रांसोबत पार पाडत असल्याचे सांगितले. वीज निर्मिती आणि जमिनीचा वापर असा दुहेरी फायदा  ॲग्री पीव्ही या प्रकल्पाचा  माध्यमातून होण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. या प्रकल्पास आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रास भेट आयोजित करावी. यातून शाश्वत शेतीसाठी प्रशिक्षणार्थीना अधिक अनुभव मिळेल असे नमूद केले. या लघु अभ्यासिकेच्या सहभागातून विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्याकरिता लाभ व्हावा. याद्वारे विचारांची देवाण-घेवाण होईल, असे प्रतिपादन केले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्याची थोडक्यात ओळख डॉ. प्रवीण कापसे यांनी करून दिली. तर मा.कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वेळ देऊन अमूल्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिल्याबद्दल अभ्यासिका संचालक डॉ. विक्रम घोळावे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, गुजरात इ. राज्यातील सहभागी शास्त्रज्ञ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.