Thursday, February 19, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांतून समाज व विद्यार्थ्यांनी घडवावे उज्ज्वल भविष्य - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय कुलगुरू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य स्वागत करून प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिवादन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, क्रीडा अधिकारी श्री. संघर्ष शृंगारे, विद्यार्थी प्रतिनिधी तथा उत्सव समितीचे अध्यक्ष संग्राम चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपण अनेक प्रेरणादायी मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. असे महान व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी माता जिजाबाई यांच्यासारखी संस्कारक्षम माता लाभणे आवश्यक आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय कार्य केले. त्यांनी रुजवलेली स्वराज्याची भावना आजही आपण अंगीकारली पाहिजे. पुढे ते म्हणाले की, येत्या चार वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला चारशे वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर ४०० वा, ५०० वा आणि अनंत काळापर्यंत त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावरून हे सिद्ध होते की महान कार्य करणाऱ्या व्यक्तींचे स्मरण अनंतकाळ केले जाते. म्हणूनच समाजहितासाठी महान कार्य करण्याचे गुण आपण सर्वांनी अंगीकारावेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात संरक्षण, आरोग्य, मान-सन्मान, शेतकरी कल्याण यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था होती. त्यांच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. हे सर्व आदर्श गुण आजच्या समाजाने अंगीकारण्याची गरज आहे. महाराष्ट्राची संस्कृती व कार्यपद्धती देशाला दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, उज्ज्वल जीवनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारावेत. विद्यापीठातील विद्यार्थी ऊर्जावान असून विविध महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्सवाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थीच करतात, हे कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांनी सर्व महाविद्यालयाचे जिमखाना विभाग व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदमार्फत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती आत्मसात करून ती संपूर्ण देशात पोहोचवावी, असे आवाहन करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही विनम्र अभिवादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूरच्या आदिलशाही व मुघल सत्तेला आव्हान देत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. ते कुशल प्रशासक, गनिमी कावा तंत्राचे जनक तसेच भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व समाजघटकांना समान सन्मान मिळत होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत सांगितले की, शिवाजी महाराजांचे आचरण पावलोपावली केल्यास जीवन सुखकर व यशस्वी होईल.

यावेळी सभागृहात विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने नेत्रदीपक सादरीकरण केले. तसेच विद्यार्थिनी साक्षी इंगळे यांनी केलेल्या शिवगर्जना आणि ऋतुजा वारे हिने केलेल्या भाषणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह संचारला. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांच्या वतीने आयोजित स्पर्धांमधील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वामन काळबांडे व आशुतोष मदेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले.

विद्यापीठाच्या मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर शिवजयंती उत्सव साजरा करून विद्यापीठाच्या मुख्य कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.