Wednesday, March 11, 2026

वनामकृवित जिल्हास्तरीय (परभणी व हिंगोली) आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा अत्यावश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




परभणी व हिंगोली जिल्ह्यातील आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ चे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १० मार्च २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील क्रीडांगणावर उत्साहात पार पडले.

या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, कृषि तंत्र विद्यालय परभणीचे प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड, तसेच क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, माणसाच्या जीवनातील सर्वांगीण विकासासाठी खेळला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. खेळ ही केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्याचे साधन नसून ती व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कृषि तंत्र शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शिक्षणाबरोबरच खेळाच्या क्षेत्रातही प्रावीण्य मिळवावे. स्पर्धेमुळे जिंकण्याची जिद्द, पराभव स्वीकारण्याची तयारी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी सर्व खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी डॉ. गजेंद्र लोंढे यांनी खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून पंचांनी दिलेले निर्णय नम्रतेने स्वीकारावेत व क्रीडा स्पर्धा शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन केले. डॉ. संतोष पिल्लेवाड यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक सादर केले.

या क्रीडा स्पर्धेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १० कृषि तंत्र विद्यालयांतील सुमारे ३०० खेळाडू, संघव्यवस्थापक व प्राचार्य सहभागी झाले होते. स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच या सांघिक खेळांसह धावणे, गोळाफेक, लांब उडी, संगीत खुर्ची, दोरीवरील उड्या व रांगोळी अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेनंतर त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गजेंद्र लोंढे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश कदम व डॉ. संघर्ष शृंगारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अशोक खिल्लारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. धीरेंद्र गोसावी यांनी केले.

क्रीडा स्पर्धा आयोजन व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नामदेव टारफे, डॉ. शशिशेखर जावळे, श्री. हनुमान बनसोडे, श्री. कुंडलीक पांचाळ, श्री. विठ्ठल रणेर, श्री. सोनवणे, श्री. शिंदे व श्री. अनिल गुरले यांनी परिश्रम घेतले.