Wednesday, September 18, 2024

कोरडवाहू शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादकता वाढविणे गरजेचे... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसित केलेल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करुन उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. इंद्र मणि मा. कुलगुरु, यांनी कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या मुल्यांकनासाठी आलेल्या केंद्रीय पंचवार्षीक समीक्षा समिती (QRT Team) यांच्या भेटीदरम्यान आयोजीत कार्यक्रमामध्ये केले. त्यांनी कोरडवाहू तंत्रज्ञान जसे की, विहीर व कुपनलिका पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पध्दत, शेततळे व त्यातील पाण्याचा पुनर्वापर, विविध आंतरपीक पध्दती तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब कोरडवाहू शेतकऱ्यांनी हवामान बदलानुरुप परिस्थितीत करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या मुल्यांकनाकरीता पंचवार्षीक समीक्षा समिती (QRT Team) प्रा. डॉ. इंद्र मणि, मा. कुलगुरु, भुवनेश्वर येथील ओडीसा कृषि विद्यापीठाचे डॉ. एस.एन. पशुपालक, ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विद्यापीठाचे माजी. कुलगुरु डॉ. ए. के. सिंग, सदस्य सचिव डॉ. जी रविंद्र चारी,  प्रकल्प समन्वयक डॉ. जे.व्ही.एन.एस. प्रसाद, तसेच प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. बल यांची भेट दिनांक १४ ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान आयोजीत करण्यात आली होती. सर्व मान्यवरांचे विद्यापीठाच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खीजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आदींची उपस्थिती होती. मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी कोरडवाहू शेतीच्या मागील ०५ वर्षाच्या संशोधनाची उपलब्धी याबाबत सादरीकरण केले. याप्रसंगी संशोधनाच्या उपलब्धतेविषयी झालेल्या चर्चासत्रात कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. मदन पेंडके, डॉ. पपिता गौरखेडे, यांनी भाग घेतला.

यादरम्यान मराठवाडा विभागातील सर्व कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक तसेच त्यांचे प्रतिनीधी याशिवाय कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रवि हरणे आणि आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक श्री दौलत चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. सर्व शास्त्रज्ञांनी व अधिकाऱ्यांनी कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या विभागात कशा प्रकारे करण्यात आला याविषयी सादरीकरण केले.

कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील विविध संशोधन प्रयोगांना समिती सदस्यांनी भेट दिली. हवामान बदलानुरुप परिस्थितीत मागील ०५ वर्षात झालेले तसेच सद्यस्थितीत चालू असलेले संशोधन याबाबत समितीने प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. तसेच हे संशोधन अधिकाधीक शेतकऱ्यांच्या शेतावर कशा पध्दतीने नेता येईल याविषयी मार्गदर्शन केले व पोहचण्याच्या दृष्टीने आवाहन केले. जेणेकरुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.

तसेच समितीने कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामार्फत हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम परभणी तालुक्यातील ०३  गावांमध्ये मागील १० वर्षापासून  राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मौजे. बाभुळगाव येथे शेतकरी मेळावा, चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट आयोजीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर अवलंब केलेले विहीर व कुपनलिका पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पध्दत, शेततळे व त्यातील पाण्याचा पुनर्वापर, विविध आंतरपीक पध्दती तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती याची भेट देवून  पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी त्यांना आलेल्या अनुभव कथन करून आपले मत व्यक्त केले. या मेळाव्यास उपविभागीय कृषी अधिकारी श्री रवि हरणे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मौजे बाभुळगाव, उजळांबा व सोन्ना येथील श्री ज्ञानोबा गणपतराव पारधे, श्री ज्ञानोबा तुकाराम पारधे, श्री भारत निळोबा आव्हाड, श्री कृष्णा ज्ञानोबा पारधे, श्री बाबासाहेब दगडूबा पारधे, श्री शिवाजी कारभारी दळवे आणि श्री गमे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या वतीने तंत्रज्ञान अवलंब केलेल्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान केला. या शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे दूत बनून विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरडवाहू शेतीच्या आधूनिक तंत्रज्ञानाचा प्रसार लगतच्या सर्व  परिसरात करावा. सध्या बहुतांश शेतकरी पारंपारिक पीक पध्दतीमध्ये कापूस, सोयाबीन, तुर, बाजरा या पिकाचा समावेश करतात. त्यामध्ये नवीन पिके फळ पिकांचा समावेश करुन अधिक उत्पादन नफा मिळविणे शक्य आहे. फळ भाजीपाला पिकामध्ये शेवगा आणि फणस याव्यतिरिक्त दुय्यम व्यवसाय जसे दुग्धोत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडुळ खत यांचा आपल्या शेतीमध्ये अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले.

समितीने ताडकळस भागातील श्री गजानन अंबुरे यांच्या शेतावर भेट देवून रुंद वरंबा सरी पध्दतीवर पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती आम्रपाली शिंदे, श्री शिवाजी काळे, श्री विलास रिठ्ठे, श्री रामकिशन तुरे, श्री संतोष धनवे, श्री सादेक शेख आणि श्री दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले.






Tuesday, September 17, 2024

वनामकृवितील रबी पीक परिसंवादास उस्फुर्त प्रतिसाद

विद्यापीठाचे विस्तार कार्य व्यवस्था केंद्रित... कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि

अचूक शेती पद्धती अवलंबणे आवश्यक .... माजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह 

आपणच आपल्या शेतीचा उत्पादनाचा भाव ठरवायचा... कर्नल श्री सुभाष दैशवाल

कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि

माजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह

कर्नल श्री सुभाष दैशवाल

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रबी पिक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि हे होते. मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी म्हणून बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि. चे संचालक माननीय कर्नल श्री सुभाष दैशवाल हे उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दौलत चव्हाण, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे विद्यापीठाचे एक प्रमुख कार्य आहे. यासाठी माजी कुलगुरू मा प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात आणि शेती उद्योगातील यशस्वी, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माननीय कर्नल श्री सुभाष दैशवाल यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यांच्या आदर्श  मराठवाड्यात रुजवून त्यांचे अनुकरण करण्यासाठी विद्यापीठ कार्य करेल. या दृष्टीनेच विद्यापीठाचे शेतकरी केंद्रित विस्तार कार्य सुरू आहे. शेतकऱ्यांचे यश अपयश समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यापीठ प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात (साधारणपणे बुधवारी) शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा अभिनव उपक्रम राबविते. शेतकऱ्यांचे म्हणणे व समस्या समजून घेण्यासाठी आठवड्यातून दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद घडवून आणला जातो. शेतकऱ्यासाठी कुलगुरू कार्यालयासह विद्यापीठाचे द्वार सतत खुले ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाचे विस्तार कार्य हे व्यक्ती केंद्रित नसून व्यवस्था केंद्रित आहे. विद्यापीठाद्वारे शेतकऱ्यांच्या सदैव सन्मान करण्यात येतो, असे नमूद केले. 

माजी कुलगुरू मा प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह म्हणाले की, हवामान बदलामुळे शेतीमध्ये तापमान वाढ आणि पर्जन्यमानामध्ये अनिश्चितता निर्माण होत आहे. यातून शेतीचे नुकसान होत असते, यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमाची आणि नियोजनाची माहिती दिली. भविष्यात हवामान बदलाची समस्या अधिक वाढू शकते. पहिली हरितक्रांती ओलिताखालील शेतीमध्ये झाली, परंतु दुसरी हरितक्रांती पर्जन्यमानावर आधारित असलेल्या कोरडवाहू शेतीमध्ये येणार आहे. यासाठी अचूक शेती पद्धती अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी शेती व्यवसायास ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. तसेच उत्कृष्ट दर्जाची बियाणे, पाणी आणि अन्नद्रव्याचा काटेकर वापर व योग्य वापर, योग्य मशागत, स्वयंचलित शेतीसाठीच्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. याबरोबरच जलसंधारणास प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचे साठवणूक करावी. पाण्याचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने एकात्मिक शेतीस प्राधान्य द्यावे असे नमूद केले. 

मा. कर्नल श्री सुभाष दैशवाल यांनी शेतकऱ्यांच्या भाषेत बोलताना नमूद केले की, गाजर या पिकाचे उत्पादन व विक्री करताना सुरुवातीस व्यापाऱ्याकडून शोषण झाले. यातून दिशा ठरवून आपणच आपल्या शेतीचा उत्पादनाचा भाव ठरवायचा ही प्रेरणा घेवून गट शेती करण्याचा निर्णय घेतला. शाश्वत शेती व्यवसायासाठी योग्य शिक्षणाची गरज असते. कृषी शिक्षण हे सर्व शिक्षणाचे एकरूप आहे. शेतीसाठी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञानकला, सामाजिक शास्त्रे, पासून ते वाणिज्य पर्यंत ज्ञान असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी स्वतः शेतीचे योग्य ज्ञान घेऊन शेतीमध्ये तज्ञ होणे आवश्यक आहे. गट शेतीतून आपसातील ज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ करून घेता येतो. शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरणाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जमीन धारणा मोठी असणे आवश्यक असते म्हणून गट शेती लाभदायक ठरली. सुरुवातीला सर्वसाधारणपणे जे घडते तेच घडले आणि शेती व्यवसायात कर्जबाजारी झालो. परंतु परत जोमाने उभा राहून गाजराची गट शेती उभारली. यासाठी १०० कोटींच्या मूलभूत सुविधा उभारल्या असून यामध्ये २५००० टनाचे शीतगृहाचा प्रामुख्याने समावेश आहे. याद्वारे जवळपास १०००  कुटुंबाचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावले आहे. शेती या व्यवसायात स्पर्धा नाही. यातून खूप मोठा मान सन्मान मिळत आहे. शेतकरी राजकार्ते, अधिकारी, व्यापारी यांना दोष देतो, परंतु आपणच आपल्या शेतमालाचे उत्पादन गुणात्मक, दर्जेदार,  संख्यात्मक असे भरपूर प्रमाणात करून आपली विश्वासहर्ता वाढविण्यास प्राधान्य द्यावे व यशस्वी व्हावे. पवित्र अशा शेती उद्योगास स्वतःला झोकून द्यावे. कुटुंबातील किमान एका व्यक्तीने तरी शेती व्यवसायाकडे वळावे. या कार्यक्रमातून माझ्यासारख्या किमान चार-पाच शेतकऱ्यांनी तरी गट शेती करण्याचा निर्णय घ्यावा आणि माझ्यासारखे बनावे ही आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि विद्यापीठाच्या विस्तार कार्याबद्दल माहिती दिली. शेतकरी कन्या स्नेहल हरकळ हिने परखड शब्दात शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या. परिसंवादाच्या निमित्ताने कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले होते यास शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. विद्यापीठांच्या शास्त्रज्ञाद्वारे लिखित पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. याबरोबरच बी  हंगामासाठी बियाणे विक्रीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कार्यक्रमात कोरडवाहू शेतीतील विविध  आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे जिल्ह्यातील पाच युवा शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलाकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. प्रीतम भुतडा यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

तांत्रिक सत्रात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव यांनी हरभरा लागवड, डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी रबी तेलबिया लागवड, डॉ. प्रीतम भुतडा यांनी रबी ज्वारी लागवड, डॉ. सुनील उमाटे यांनी गहू लागवड डॉ. विश्वनाथ खंदारे रबी भाजीपाला लागवड, डॉ. गजेंद्र लोंढे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, डॉ.  गजानन गडदे आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनी सद्य परिस्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन, डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी फळबाग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. वन्य जीव प्राण्यापासून होणारे शेतीचे नुकसान आणि मानवी हानीच्या भरपाई साठी  असलेल्या विविध कायद्याचे आणि मदतीचे बद्दल निवृत्त वनक्षेत्र सहाय्यक अधिकारी  श्री शिवाजी गिरी यांनी मार्गदर्शन केले. शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शेतीविषयक प्रश्नांना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमामध्ये सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी यांच्यासह एक हजाराहून अधिक शेतकरी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर जवळपास १४०० ऑनलाईन अशा एकूण २४०० शेतकऱ्यांनी सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला.










वनामकृवित मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

जन्मलो आणि वास्तव्यास आहोत त्या भूमीचा अभिमान, गौरव करून समर्पित भाव ठेवावा... कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त दिनांक १७  सप्टेंबर रोजी मुख्य प्रांगणात कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी म्हणून बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि. चे संचालक माननीय कर्नल श्री सुभाष दैशवाल हे होते. तसेच शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजेंद्र लोंढे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर आदीसह विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी मराठवाडा मुक्ती करिता शहीद वीरांना विनम्र अभिवादन करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्येकांनी आपण जेथे जन्मलो आणि वास्तव्यास आहोत त्या भूमीचा अभिमान, गौरव करावा आणि समर्पित भाव ठेवावा. विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर अनेक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असून पुढाकार करत आहे. विद्यापीठ मनुष्यबळ विकासावर भर देत आहे. शास्त्रज्ञांनी आणि विद्यार्थ्यांनी विदेशात तसेच देश पातळीवर प्रशिक्षण घेतले. याचा लाभ मराठवाड्यातील शेती विकासासाठी होत आहे. विस्तार कार्य शेतकरी केंद्रीत असून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ अशा अभिनव उपक्रमासह विविध विस्तार कार्य करत आहे. संशोधनामध्ये नवाचार यावर भर असून विविध वाण, तंत्रज्ञान, अवजारे, जमीन विकसित करून बीजोत्पादनाचे कार्य सुरु आहे. शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यापीठाने यावर्षीपासून नवीन चार महाविद्यालये सुरु केले असून या वर्षा पासून नवीन शैक्षणिक धोरण विद्यापीठात लागू करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय छात्र सैनिकांनी माननीय कुलगुरू यांना छत्र अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर जयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायक श्री उदय वाईकर यांनी केले.










Monday, September 16, 2024

वनामकृवित हवामान अनुकूल शेती या विषयावर माजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह यांचे व्याख्यान

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने हवामान अनुकूल (क्लायमेट स्मार्ट) शेती याविषयावर ग्वालियर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह यांचे  व्याख्यान दिनांक १६ सप्टेंबर रोजी आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आदींची उपस्थिती होती.

हवामान अनुकूल (अचूक) शेती याविषयाचे तज्ञ माजी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह यांनी हवामान बदलाची सुरुवातीस कारणे सांगितली. जागतिक, देश आणि राज्य पातळीवरील होणारे हवामान बदलाचे प्रामुख्याने तापमानात वाढीच्या परिणामाविषयी बोलताना ते म्हणाले की १.५ अंश तापमानात वाढ झाली तर दुष्काळाची तीव्रता दुप्पट होऊ शकते आणि २.० अंश तापमानामध्ये वाढ झालीतर दुष्काळात दुपटीपेक्षाही अधिक वाढ होऊ शकते. मागील दहा वर्षातील तापमान झालेला बदल नमूद करून शेती उद्योगावर होणारे परिणाम आणि पीक उत्पादनातील घट नमूद केली. भविष्यात २०५० मध्ये १.७ मिलियन होणाऱ्या लोकसंख्येसाठी आजच्या पेक्षा चार पटीने उत्पादन तसेच पाण्याचे साठवण तीन पट वाढवावे लागेल. एवढेच नव्हे तर जैवतंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये सुधारणा करून मजुरांची कार्यक्षमता ही सहा पटीने वाढवावे लागेल. तसेच अन्न व पोषण सुरक्षितता, उत्पन्न वाढ आणि रोजगार निर्मिती, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे, शाश्वत आणि उत्कृष्ट जीवनमान जगण्यासाठी बाबींना प्राधान्यक्रम द्यावा लागेल. याकरिता महत्त्वाचा बाब म्हणजे हवामान अनुकूल (क्लायमेट स्मार्ट) शेती (अचूक शेती) ही आहे. यासाठी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, पाण्याचा पुरेपूर वापर, खतांची क्षमता वाढवणे, रासायनिक औषधांचा कमीत कमी वापर, कमीत कमी मशागत, मजुरांची कार्यक्षमता वाढवणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश महत्त्वाचा आहे.  यावेळी त्यांनी हवामान अनुकूल (क्लायमेट स्मार्ट) शेतीसाठीचे करावयाच्या उपायोजना आणि टप्पे प्रामुख्याने विशद केले. 

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अन्न, पाणी आणि ऊर्जा या लोकसंख्येसाठी महत्त्वाच्या बाबी आहेत. पाण्याचा न्यायिक वापर होणे तसेच मातीचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. यासाठी सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फर्टिगेशन यासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असून शेती स्वयंचलित करून पाण्याची बचत करावी लागेल. हवामान अनुकूल (क्लायमेट स्मार्ट) शेतीसाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व या कार्यक्रमातून आपण जाणून घेतले. याच धर्तीवर विद्यापीठांमध्ये पाच नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनावर संशोधन केंद्र असून चार आधुनिक प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत. विद्यार्थ्यांना आणि शास्त्रज्ञांना या मार्गदर्शनाची त्यांच्या संशोधनासाठी मदत होईल. या ज्ञानाचा पुरेपूर लाभ करून घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. 

शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी विद्यापीठातील तरुण शास्त्रज्ञ आणि पदव्युत्तर तसेच आचार्य  अभ्यासक्रमास असलेल्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन तसेच हवामान अनुकूल (क्लायमेट स्मार्ट) शेती या संकल्पनेची माहिती विख्यात शास्त्रज्ञ माजी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ) अनिल कुमार सिंह यांच्याकडून आत्मसात करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे असे प्रस्ताविकात नमूद केले.

कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजेंद्र लोंढे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला

कार्यक्रमात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह विद्यापीठातील शास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे, डॉ. के. टी. जाधव, डॉ. गजेंद्र जगताप यांच्यासह पदव्युत्तर तसेच आचार्य  अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी माजी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ) अनिल कुमार सिंह यांच्याशी संवाद साधला आणि कार्बन क्रेडिट ,ग्रीन वायू, हवामान अनुकूल पीक पद्धती अशा विविध प्रश्नावर चर्चा करून अधिकची माहिती मिळवली. सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी तर आभार डॉ. सचिन मोरे यांनी मानले.