Thursday, July 23, 2026

वनामकृवित बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटरसाठी सामंजस्य करार व नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भाकृअनुप–अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेसंदर्भात श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) यांच्याशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार असून, त्यानिमित्त नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित राहतील. प्रमुख उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच अकोला येथील महाबीजचे महाव्यवस्थापक श्री. दिलीप स्वामी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी, शाकंभरी सीड बँकेच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमामुळे बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या वापराला चालना मिळण्याबरोबरच नैसर्गिक शेतीचा प्रसार, शाश्वत कृषि पद्धतींचा अवलंब आणि शेतकऱ्यांना आधुनिक, पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) चे संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे तसेच श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक)चे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.