Wednesday, July 22, 2026

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महसूलपासून आरोग्यापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली

 शेतकऱ्यांशी थेट संवादातून आधुनिक शेतीला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध – माननीय जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण





नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला' परभणीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत लाभार्थ्यांना योजनांचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभवितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नागरिकाभिमुख उपक्रम, आधुनिक शेती, कायदा व सुव्यवस्था तसेच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प व्यक्त केला.

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त परभणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दिनांक २२ जुलै २०२६ रोजी संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माननीय अध्यक्षा श्रीमती लता वाकळे, महापौर माननीय श्री. सय्यद इक्बाल सय्यद खाजा, कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण, कृषितज्ज्ञ पद्मश्री श्री. श्रीरंग देवबा लाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नताशा माथूर, उपविभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' या उपक्रमाचे कौतुक केले. शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजांनुसार मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी राज्य शासनाने 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित अडचणी तत्परतेने सोडविण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील दळणवळणाची प्रमुख रक्तवाहिनी मानल्या जाणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद झालेल्या जिल्ह्यातील अनेक पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज पोहोचणे, कृषि मालाची वाहतूक करणे आणि ग्रामीण दळणवळण अधिक सक्षम होण्यास मोठी मदत होत आहे.

महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विशेषतः एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून, त्यांना आवश्यक मार्गदर्शन व शासकीय सेवाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचबरोबर नागरिकांनी आभा कार्ड तयार करून घ्यावे, विविध आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होऊन गणना फॉर्म वेळेत भरावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पद्मश्री श्रीरंग लाड यांनी कापूस पिकासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शास्त्रशुद्ध पद्धतीने कापूस लागवड करावी. तसेच महिला शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने व सक्षमपणे शेती करत नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अधिक उत्पादन व आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सांगितले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. 'पोलीस आपल्या दारी' हा उपक्रम पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा असल्याचे सांगून सुरक्षित, शांततामय व गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नगरसेवक केदार खटींग, जिल्हा परिषद गटनेते दिलीप देशमुख, सुरेश भुमरे व शिवाजी भरोसे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अर्जुन पाटील, नारायण राऊत आणि शुभांगी सर्जे या लाभार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे' उद्दिष्टे व महत्त्व विषद केले. यावेळी विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओ तसेच भूमिअभिलेख अधिकारी सुनील मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नागरिकांच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉल प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.
(सौजन्य – जिल्हा माहिती अधिकारी, परभणी)