महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे महत्त्वाचे नगदी पीक असून, त्याच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात अवलंबून
आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होण्यामागे किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण
आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे सोयाबीनचे एकत्रितपणे ७१ टक्क्यांपर्यंत, तर केवळ उंटअळीमुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या सोयाबीन
पिकावर उंटअळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन
पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. राजरतन खंदारे व डॉ.
योगेश माने यांनी केले आहे.
सोयाबीन पिकाचे
वेळोवेळी कीड सर्वेक्षण करून पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी व
केसाळ अळी यांची अंडी आणि अळीग्रस्त पाने अलगद तोडून अळीसह नष्ट करावीत.
तंबाखूवरील पाने खाणारी अळी व हिरवी घाटेअळी यांच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येक
किडीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडून नष्ट
करण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच शेतात
इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे ५० पक्षीथांबे प्रतिहेक्टरी
उभारावेत.
तंबाखूवरील पाने
खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी नोमुरिया रिलाय या बुरशीची ४ ग्रॅम प्रतिलिटर
पाण्यात मिसळून प्रादुर्भाव आढळताच फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५
टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
किडींची संख्या आर्थिक
नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच कीटकनाशकांची फवारणी करावी. यासाठी फ्लूबेंडामाईड
३९.३५% एससी ०.३ मिली, क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५% एससी ०.३ मिली,
इमामेक्टीन बेंझोएट १.९०% ईसी ०.८५ मिली, टेरॅनिप्रोल
१८.१८% एससी ०.५–०.६ मिली, नोव्हाल्युरॉन ५.२५% +
इंडॉक्साकार्ब ४.५०% एससी १.६५–१.७५ मिली किंवा ॲसिटामीप्राईड २५% + बायफेंथ्रीन
२५% डब्लूजी ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकाची आलटून-पालटून
फवारणी करावी.
वरील कीटकनाशकांचे
प्रमाण साध्या किंवा नॅपसॅक पंपासाठी असून, पेट्रोल
पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे तसेच फवारणी
करताना सुरक्षिततेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन
तज्ज्ञांनी केले आहे.
.jpeg)


.jpeg)


