Sunday, August 16, 2026

वनामकृविच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या अडचणी व अपेक्षा

 

महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि व संलग्न शाखांमधील विद्यार्थ्यांशी विद्यापीठात दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कठोर मेहनत घ्या, प्रामाणिकपणे कार्य करा, नीती-मूल्यांचे पालन करा आणि आई-वडिलांचा सन्मान करा.” कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यांची सांगड घालत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कृषि क्षेत्रासमोरील बदलती आव्हाने लक्षात घेता विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अपेक्षा त्यांनी समजून घेतल्या.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, परभणी महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल सय्यद खाजा, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, परभणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. श्रीकांत विटेकर, सेलू नगरपरिषदेचे अध्यक्ष श्री. मिलिंद सावंत, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी झालेल्या या संवादामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्या व अपेक्षा थेट कृषिमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. माननीय कृषिमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत कृषि शिक्षण व शेतकरीहितासाठी गुणवत्तापूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले.