Friday, August 21, 2026

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश देत परभणीकरांचा ‘महा-वॉकेथॉन’मध्ये उत्स्फूर्त सहभाग

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील क्रीडा संकुलापर्यंत या महा-वॉकेथॉनची सांगता

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देत परभणी येथे ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे दिनांक २१ ऑगस्ट २०२६  रोजी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्यभरात २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये, विशेषतः युवकांमध्ये, मृद व जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्याच्या उद्देशाने महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील क्रीडा संकुलापर्यंत या महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती लता विजयकुमार वाकळे यांच्या हस्ते वॉकेथॉनचा शुभारंभ झाला.

या कार्यक्रमास परभणी महानगरपालिकेचे महापौर श्री. सय्यद इक्बाल सय्यद खाजा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, मनपा आयुक्त श्री. नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोन्सीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माती आणि पाणी ही अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश जनमानसात रुजविणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता वाढविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे.

क्रीडा संकुल येथे झालेल्या सांगता समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जलसंधारण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग, आपली बांधिलकी – जलसंवर्धनाची हीच खरी शक्ती’ हा संदेश प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन केले. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसमृद्ध आणि हिरवागार महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे आणि मातीची धूप रोखणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील जलस्रोत, पाणलोट क्षेत्र आणि मातीच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

मनपा आयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांनी दैनंदिन जीवनात पाणी बचत आणि जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले.

पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘माती वाचवा, पाणी वाचवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल, जपुया त्याचे मोल’, ‘पावसाचा प्रत्येक थेंब अडवूया, हिरवागार महाराष्ट्र घडवूया’, ‘थेंब थेंब पाणी साठवूया, भविष्यातील दुष्काळ टाळूया’, ‘पाणी नाही तर विकास नाही’, ‘जलसंधारणाशिवाय पर्याय नाही’, ‘जल है तो कल है’ अशा घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जलसंधारण विभागाच्या वतीने रील्स बनवा, बक्षीस मिळवा’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर, डॉ. फरिया खान, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सुभाष विखे तसेच गांधी विद्यालयाच्या प्राचार्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिक, विद्यार्थी आणि प्रशासकीय यंत्रणेचे मृद व जलसंधारण विभाग, परभणीचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी मनःपूर्वक आभार मानले.