Friday, August 21, 2026

वनामकृवित माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते सुधारित तुती लागवड उपक्रमाचा शुभारंभ; रेशीम उद्योग अधिक फायदेशीर करण्यासाठी संशोधनावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील रेशीम संशोधन योजनेअंतर्गत सुधारित तुती लागवड उपक्रमास दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते तुतीची रोपे लावून सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सुधारित तुती लागवड उपक्रमाचा लाभ राज्यातील सर्व रेशीम उद्योजकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. विद्यापीठामध्ये रेशीम उद्योगाशी संबंधित संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि प्रात्यक्षिकांना प्राधान्य देण्यात येत असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील रावे (Rural Agricultural Work Experience) घटक संलग्नता उपक्रमांतर्गत रेशीम संशोधन योजनेस संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींचा विचार न करता कृषि क्षेत्रातील विविध संधींचा अभ्यास करून कृषि व रेशीम उद्योगामध्ये उद्योजक म्हणून पुढे यावे, असा सल्ला माननीय कुलगुरूंनी दिला.

रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. धीरजकुमार कदम यांनी सुधारित तुती लागवड उपक्रमाचे महत्त्व विशद केले. रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, तुतीची उत्पादकता, पानांची गुणवत्ता तसेच लागवडीसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च यांचा विचार करून योग्य लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत रेशीम संशोधन योजनेच्या प्रक्षेत्रावर विविध अंतरावर तुतीची वृक्ष व झुडूप पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. या प्रक्षेत्रावर विविध लागवड पद्धतींचे संशोधन व प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून, त्यातून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्रातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर तुती लागवड पद्धतीची शिफारस करण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम उद्योजकांना तुतीची उत्पादकता वाढविण्यास तसेच रेशीम उद्योग अधिक फायदेशीर करण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. के. टी. जाधव, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, डॉ. कुलदीप शर्मा, डॉ. अविनाश राठोड, डॉ. अर्चना घनवट, शास्त्रज्ञ श्री. धनंजय मोहोड, डॉ. संजोग बोकन, श्री. ऋषिकेश औंढेकर आणि श्री. दत्ता जटाळे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू गंभीरे, अनंत गाडेकर, रोहित मोरे, राधिका चव्हाण, प्रवीण वडकुते, विश्वनाथ काकडे आणि विठ्ठल मोहिते यांनी परिश्रम घेतले.